नळदुर्ग किल्ला

रसिकतेची ग्वाही देणारा किल्ला

एकेकाळी धाराशीव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्यालय असलेले नळदुर्ग हे उस्मानाबादच्या आग्नेयेकडे सुमारे ५० किमी अंतरावर आहे.नळदुर्ग किल्ला हा याच उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग शहरातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. मध्ययुगीन स्थापत्य शैलीत किल्ला बांधणाऱ्या नलराजाच्या नावावरून नळदुर्ग किल्ल्याला हे नाव देण्यात आले आहे. या किल्ल्याचे वैशिश्ट्य म्हणजे किल्ल्याच्या मध्यभागी नदी वाहत असून त्याच्या बाजूने तटबंदी घातलेली आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंनी तटबंदी आहे तर एका बाजूने नदी आहे. हा किल्ला मुळात कल्याणीच्या चालुक्य हिंदू राजाने बांधला असे म्हटले जाते. हा किल्ला कालांतराने बहमनी अधिपत्याखाली आला आणि नंतर विजापूर आणि शेवटी मुघलांच्या ताब्यात गेला. मराठ्यांच्या हातात हा किल्ला साधारण ३-४ वर्षे होता.

नळदुर्ग किल्ला हा मध्ययुगीन भारतातील लष्करी अभियांत्रिकी आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. नळदुर्ग किल्ला हा एक अवाढव्य किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी 114 बुरूजांसह 3 किमी लांबीची आहे. बुरुज अतिशय मजबूत बांधलेले आहे आणि ते जड तोफा पेलण्याइतके मोठे आहे. संपूर्ण परिघ सुमारे दीड मैल आहे. आतील भाग आता तटबंदींच्या भिंतींनी झाकलेला आहे, मध्यभागी किल्ल्यामध्ये जाणारा एक विस्तीर्ण रस्ता आहे. किल्ल्याला अनेक बुरुज आहेत त्यापैकी उपळ्या बुरुज, परांडा बुरुज, नगर बुरुज, संगम बुरुज, संग्राम बुरुज, नौबुरुज, पूणे बुरुज असे विविध बुरूज आहेत. किल्ल्याच्या आत भिंतींचे अवशेष आणि काही जुन्या इमारतींचे पडझड झालेले अवशेष आहेत. इमारतीतील बारूद कोठी, बारादरी, अंबरखाना, रांगण महाल, जाळी इत्यादी इमारती भग्नावस्थेत असल्या तरी या अवशेषांवरून एके काळी ही वैभवशाली वास्तू असल्याचा भास होतो, किल्ल्यावर दोन टाकी आहेत.

उपळी बुरूजावर 18 फूट आणि 21 फूट उंचीच्या दोन तोफा,हाथी तोफ आणि मगर तोफ फार पूर्वी बसवलेल्या आहेत.

हत्ती दरवाजा आणि हुरमुख दरवाजा हे किल्ल्याचे मुख्य दरवाजे आहेत. किल्ला आणि पलिकडील जुना किल्ला यांना जोडणारी वास्तू म्हणजे बोरी नदीच्या पलीकडे बांधलेले धरण. दुसरा इब्राहिम आदिल शाहच्या कारकिर्दीत धरण आणि धरणाच्या भिंतीत मध्यभागी "पाणीमहाल" बांधण्यात आला. चांद बीबी सुलताना आणि अली आदिल शाह यांचा विवाह याच किल्ल्यावर झाला. नवाब अमीर नवाजुल मुल्क बहादूर आणि निजाम उल मुल्क II मझार यांची कन्या राजकुमारी फखारुन्निसा बेगम यांची कबर नळदुर्ग येथे आहे. किल्ला अद्यापही टिकून आहे आणि किल्ल्याच्या भिंती बेसाल्ट खडकापासून बांधलेल्या आहेत. धरणाची उंची 90 फूट, लांबी 275 मीटर आणि माथ्यापासून 31 मीटर रुंद आहे.

धरणाच्या केंद्रस्थानी एक खोली आहे ज्यात एक सुंदर नियोजित गॅलरी आहे ज्याला पाणीमहाल म्हणतात खऱ्या अर्थाने पाण्याचा किल्ला. गडावर एक उत्कृष्ट तलाव बनवून धरणामुळे बोरी नदी खाली ठेवली आहे. जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा पाण्याचा प्रवाह धरणाच्या वर वळणावळणात येतो आणि पाणी-महालात भिजत न बसता यामुळे आलेले धबधबे पाहता येतात. या धबधब्यांना नर-मादा धबधबा असे नाव आहे. पावसाळ्यामध्ये हे धबधबे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. या धरणचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आतल्या बाजूस असणारी पाणचक्की. धरणाचे पाणी आतल्या बाजूस वळवून पाण्याच्या प्रवाहावर चालणारी आटाचक्की इथे पाहता येईल. या धरणाच्या आतील बाजूस अगदी शेवटपर्यंत उतरता येण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. अर्थातच आता त्या जाळी घालून बंद केलेल्या आहेत. तत्कालीन अभियांत्रीकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या धरणाकडे पाहता येईल. किल्ल्याच्या आत एक चारशे वर्ष जुनी मस्जीद देखील आहे.

नदी पलिकडे जुना किल्ला आहेय. हाच तो नळराजाने बांधलेला किल्ला. या धरणाच्या दुसऱ्या बाजूस फाशी दरवाजा आहे. या बाजूस काही अपघात झाल्याने येथे जाणारे रस्ते सध्या बंद केलेले आहेत. धरणाच्या खालच्या बाजूस गार्डन तयार केले होते आणि लाईट शोची तजवीज केली होती. पण मध्यंतरी आलेल्या पुरीमुळे हे सर्व वाहून गेले. एकुणच एक उत्कृष्ट कलाकारीचा नमुना पहायचा असेल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या.

Advertise With Us
Advertise With Us